पुणे : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या सर्वदूर पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालेला असून, रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठीही आशादायक चित्र निर्माण झालेले आहे. रब्बीमध्ये प्रामुख्याने ज्वारी, गव्हाच्या क्षेत्रात निश्चित वाढ अपेक्षित असून, हरभर्याचा पेरा नवा उच्चांक गाठण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तर, रब्बीमध्ये सुमारे 62 लाख 77 हजार हेक्टरवरील पिकांच्या पेरण्यांचे नियोजन कृषी आयुक्तालयाने केल्याचे सांगण्यात आले. खरीप हंगामात पावसाने ताण दिल्याने पिकांच्या उत्पादनात घट येण्याचा अंदाज यापूर्वीच कृषी आयुक्तालयाने वर्तविला आहे.
संबंधित बातम्या :
पीक कापणी प्रयोग आणि प्रत्यक्ष पिकांच्या काढणीनंतरच याबाबतचे स्पष्ट चित्र समोर येईल. मात्र, गेल्या महिनाभरातील पावसामुळे विशेषतः रब्बी हंगामासाठी पिकांच्या पेरण्यांसाठी जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध झाला आहे. शिवाय पाणी साठवणक्षमताही निर्माण झाल्याने पेरण्यांसाठी आशादायक स्थिती उपलब्ध झाली आहे. राज्याचे रब्बी हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र 53 लाख 96 हजार 969 हेक्टर इतके आहे, तर कृषी आयुक्तालयाच्या नियोजनानुसार प्रत्यक्षात 62 लाख 77 हजार हेक्टरवर रब्बीतील पिकांच्या पेरण्या होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रत्यक्षात 10 लाख 49 हजार 600 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून (महाबीज) 3 लाख 27 हजार 130 क्विंटल, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (एनएससी) 58 हजार 810 क्विंटल आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून सर्वाधिक म्हणजे 6 लाख 69 हजार 811 क्विंटल मिळून 10 लाख 55 हजार 751 क्विंटल इतक्या बियाण्यांची उपलब्धता आहे. गरजेपेक्षा 6 हजार क्विंटलने बियाण्यांची उपलब्धता अधिक आहे.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आपण साजरे करीत असल्यामुळे रब्बी हंगामात ज्वारीच्या क्षेत्रवाढीवर कृषी विभागाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तसेच ज्वारीला मिळणारा चांगला दर पाहता शेतकर्यांचाही त्यास प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. रब्बी हंगामातील ज्वारीसह गहू, हरभरा आणि तेलबियांच्या उत्पादकतेच्या वाढीसाठीही प्राधान्य देण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरण्यांसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
विकास पाटील, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) कृषी आयुक्तालय, पुणे