राष्ट्रीय नव्या रेल्वे प्रकल्पानुसार 2030 पर्यंत रेल्वेमार्गाची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात असून त्यानुसार सुमारे 47 टक्के लोक रेल्वेतून प्रवास करतील असे गृहित धरले आहे. तसेच मालवाहतुकीसाठी देखील रेल्वेचाच वापर व्हावा, याद़ृष्टीने प्रयत्न होत आहेत. यानुसार 2050 पर्यंत हेच प्रमाण कायम ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कारण आर्थिक विकासासह रेल्वेची क्षमता वाढविली नाही तर हे प्रमाण कमी होऊ लागेल. 'वंदे भारत' रेल्वेची रचना आणि निर्मिती याचे काम भारतातच होत आहे. कमी किमतीत गाड्यांची निर्मिती केली जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही दुसर्यांशी स्पर्धा करत आहोत. कालांतराने परदेशातूनही ऑर्डर मिळू शकतात आणि भारत अशा रेल्वे निर्यातीचे केंद्र होऊ शकते. भारतात आजघडीला 34 वंदे भारत गाड्या धावत आहेत आणि या योजनेच्या पहिल्या टप्प्यांत चारशे वंदे भारत सोडण्याचे ध्येय आहे. वंदे भारत रेल्वेसंदर्भात वरवर मत मांडले तर ही श्रीमंतांची रेल्वे आहे, असे म्हटले जाते, पण वंदे भारतचे ध्येय हे समानता साध्य करण्याचे आहे.