पुढारी ऑनलाईन डेस्क : हवामान विभागाच्या ताज्या बुलेटीननुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या 'X' वरून (पूर्वीचे ट्विटर) दिली आहे.
डॉ. होसाळीकर यांनी म्हटले आहे की, बुधवार (६ सप्टेंबर) आणि गुरूवार (दि.७ सप्टेंबर) या दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भाग तसेच विदर्भातील काही भागात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. शनिवारपर्यंत (९ सप्टेंबर) राज्यातील कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विर्भात यलो अलर्ट देण्यात आला असून, मुसळधार पावसाची शक्याता आहे. तर ७ सप्टेंबरपर्यंत विर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, याठिकाणी अतिमुसळधारेतची शक्यता देखील आहे, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असल्याने राज्यात मान्सून पूर्णतः सक्रिय होत आहे. आजपासून (दि. ५ सप्टेंबर) ते ८ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भाला ऑरेंज, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.