पाऊस न पडल्यास मुंबईत पाणीकपात

पाऊस न पडल्यास मुंबईत पाणीकपात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ऑगस्टमध्ये अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठ्यात जेमतेम वाढ झाली आहे. १ ऑक्टोबरपर्यंत हे जलाशय शंभर टक्के न भरल्यास मुंबई शहरवासीयांना दहा ते पंधरा टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागू शकते, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

ऑक्टोबरमध्ये पावसाळा संपतो. दरवर्षी मुंबई महापालिकेकडून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जलाशयांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. यावेळी जलाशयांमध्ये पाणी पुरेसे नसेल तर जलअभियंत्यांकडून तसा अहवाल दिला जाईल आणि त्यानंतर पुढील पावसाळ्यापर्यंत या जलाशयांमधील पाणी पुरेल अशा बेताने पाणीकपात सुचवली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या जल विभागाचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी शनिवारी सर्व धरणांची पाहणी केल्यानंतर दिली. सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस पडल्यास कपात लागू होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईकरांना महापालिकेच्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये आतापर्यंत ९०.६९ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी या सर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. ३ सप्टेंबर २०२३ रोजी १३ लाख १२ हजार ६७३ दशलक्ष लिटर्स अर्थात ९०.७४ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news