

पुणे : पुढारी वृत्तसेवा
'तळेगावमध्ये 250 एकरवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी व्हेंडर पार्क उभारण्याची एमआयडीसीची योजना आहे,' अशी माहिती एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अनबलगन यांनी मंगळवारी पर्यायी इंधन कॉन्क्लेव्हमधील 'एनहान्सिंग ईव्ही प्रॉडक्शन इन इंडिया' या विषयावरील चर्चासत्रात दिली.
नजीकच्या काळात इतरत्र 300 मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क 10 हजार एकर क्षेत्रावर निर्माण केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारचे ईव्ही धोरण या उद्योगाला प्रोत्साहन देणारे असून, त्यामुळे या वाहनांचा वापर भविष्यकाळात मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यामुळे 2025 पर्यंत देशात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण 25 ते 30 टक्के असेल, असे मत यात विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता आणि महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.
अनबलगन म्हणाले, 100 कोटी रुपये गुंतवणुकीलाही मेगा प्रकल्पाचा दर्जा या क्षेत्रातील कंपन्यांना एमआयडीसी देत आहे. एरवी 1500 कोटी रुपये गुंतवणूक करणार्या कंपन्यांना हा दर्जा दिला जातो. समृद्धी महामार्ग आणि पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरही अशा सुविधा निर्माण केल्या जातील. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांकडून गुंतवणुकीचा ओघ सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यायी इंधनाबाबतची कॉन्क्लेव्ह ही पर्यावरण चळवळीची यशस्वी सुरुवात पुण्यातून झाली. पुण्याने एखादे पाऊल पुढे टाकले तर खरोखर मोठा बदल घडू शकतो, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यायी इंधन कॉन्क्लेव्ह समारोपप्रसंगी केले. या ठिकाणी 15 हून अधिक देशांचे कॉन्सल जनरल हजर होते. या उपक्रमामागचा संदेश त्यांच्यामुळे जगभर जाणार आहे. या पर्यायी इंधन कॉन्क्लेव्हला मिळालेल्या विधायक प्रतिसादामुळे हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य झाले आहे. हा उपक्रम गेमचेंजर ठरला, ही आनंदाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले.