नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक व्यवहारासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) तसेच केंद्र सरकारकडून करण्यात आलेले काही महत्त्वपूर्ण बदल रविवारपासून अमलात येत आहेत. यात वेतन आणि पेन्शन, एटीएम व्यवहार अशा बदलांचा समावेश आहे. या बदलांनुसार आता वेतन आणि पेन्शन सुट्टीच्या दिवशीही जमा होऊ शकणार आहे.
1 ऑगस्टपासून पगार, निवृत्तीवेतन सुट्टीच्या दिवशीही खात्यात जमा होणार आहे. कारण, बल्क पेमेंट सिस्टीम नॅशनल ऑटोमेडेट क्लिअरिंग हाऊस (नॅच) आता वीकेंडलाही सुरू राहणार आहे.
कर्मचार्यांच्या पगारासाठी तसेच इतर प्रकारच्या पेमेंट्ससाठी बहुतांश कंपन्या 'नॅच' प्रणालीचाच वापर करतात. आतापर्यंत रविवारी किंवा बँकेच्या सुट्टीच्या दिवशी ही सुविधा उपलब्ध नव्हती.
ती आता आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध होणार आहे. दरम्यान, गृहकर्ज, एसआयपी, विमा हप्ता, ईएमआय हप्तेही सुट्टीच्या दिवशी खात्यातून डेबिट होणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना वर्किंग डेची वाट पाहावी लागणार नाही.
रिझर्व्ह बँकेने एटीएम व्यवहारांवरील इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये केले आहे, तर बिगरआर्थिक सेवांसाठीचे शुल्क 5 रुपयांवरून वाढवून 6 रुपये करण्यात आले आहे.
आरबीआयच्या नियमानुसार, प्रत्येक ग्राहकाला एटीएमच्या माध्यमातून महिन्याला पाच व्यवहार विना शुल्क करता येतात. यामध्ये अन्य बँकांच्या एटीएमचा वापर करणेही ग्राह्य ठरले जाते.
आयसीआयसीआय बँकेने रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्कातही वाढ केली आहे. आता बँकेच्या ग्राहकांना महिन्यात फक्त चारवेळाच बँक खात्यामधून पैसे काढता येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये द्यावे लागतील.
मेट्रो शहरातील ग्राहकांना 3 एटीएम व्यवहार नि:शुल्क असून, इतर शहरांतील ग्राहकांना 5 वेळा मोफत पैसे काढता येतील. यानंतर होणार्या प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये शुल्क द्यावे लागेल.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकची (आयपीपीबी) डोअरस्टेप बँकिंग सेवा आतापर्यंत नि:शुल्क होती. मात्र, आता त्यासाठी पैसे आकारले जाणार आहेत. ही रक्कम वीस रुपये अधिक जीएसटी अशी असेल. याव्यतिरिक्त ग्राहकांचे पैसे ट्रान्स्फर करणे आणि मोबाईल पेमेंटसाठीही तितकेच शुल्क अदा करावे लागेल.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
घरगुती वापराचा सिलिंडर महागण्याची शक्यता