निपाणी पुढारी वृत्तसेवा : लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, याचा जणू विसरच पडल्याचे सध्याच्या निवडणुकीतील वातावरणानुसार दिसून येत आहे. सर्वच निवडणुकांमध्ये रकमेच्या वजनावर मतांचे पारडे जड बनत असल्याची विचारसरणी सर्वंकंषदृष्ट्या दूढ बनत आहे. त्यामुळे 'मतदान' वैचारिकता 'मतविक्री'त हरवत चालल्याचे जाणवत असून निवडणुका म्हटले की केवळ पैशांच्या गणिताचे समीकरण बनत चालले आहे.
घटनेने दिलेले अधिकार आणि हक्क बजावताना त्याची मोजमाप होण्याची मानसिकता चुकीचे वळण घेत आहे. निवडणुकांचे हे बदलते स्वरूप केवळ पद आणि सत्ता याच्यापाशी घोंगावत असून याला आता समाजात प्रतिष्ठेचे स्थान असलेला शिक्षित मतदारही बळी पडत आहे. ग्रामपंचायतीपासून आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकांत तर हे सर्वंकष चित्र बनत चालले आहे.
आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही असे चित्र नजरेसमोर येऊ लागल्याने घटनेचे हक्क आणि अधिकार बजावण्याचा जणू विसरच पडलेला दिसून येतो. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिक्षकांची चांदी झाल्याचेही बोलले जात आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतही बहुमोल मत देताना हा प्रकार घडल्याने लोकशाहीमध्ये निवडणुकांचे बदलते स्वरूप चिंतनीय विषय बनला आहे. आता सर्वसामान्य जनता एखाद्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावताना कोणत्या वैचारिकतेने मतदान करणार, हा विचार गंभीर वळणावर जाताना दिसून येतो. निवडणुकांचे हे स्वरूप बदलण्याची गरज असल्याचेही सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे
जनसेवेसाठी उमेदवाराची निवड करून देताना हक्क आणि अधिकार यांचा विसर पडत रकमेच्या गोळाबेरजेवर मतदान होऊ लागल्याचे बोलले जात आहे. याबाबत नाराजी जरी असली तरी अनेकजण वास्तवाला बळी पडत आहेत. त्यामुळे निवडणुका म्हणजे केवळ पैसेवाल्यांचा खेळ, अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून पुढे येत आहेत.
हेही वाचा