इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा : तांबवे (ता. वाळवा) येथील स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष रविकिरण राजाराम माने यांना घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तिघांना गुरुवारी कासेगाव पोलिसांनी अटक केली. अभिजित भांबुरे, स्वप्निल सूर्यवंशी (रा. इस्लामपूर), सत्यजित कदम (शिराळा) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील आमदार सदाभाऊ खोत (mlc sadabhau khot) यांचे पुत्र सागर खोत हे अद्याप फरारी आहेत. अटक केलेल्या तिघांना येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविकिरण माने हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष आहेत.
राजकीय हेव्या-दाव्यातून रयत क्रांतीचे कार्यकर्ते माने यांच्यावर चिडून होते. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास माने हे घरी जेवायला बसले होते.
त्यावेळी संशयित स्वप्निल, आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर हे हातात चाकू, अभिजित गुप्ती, सत्यजित तलवार घेऊन जबरदस्तीने माने यांच्या घरात घुसले होते अशी तक्रार आहे.
'सदाभाऊंवर टीका करतोस, तुला मस्ती आली काय,' असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी संशयितांनी दिली.
त्यावेळी घरातील लोकांनी व शेजारचे भास्कर मोरे, विश्वास जाधव यांनी हल्लेखोरांना अडविले.
संशयित चौघांनी धक्काबुक्की करून माने यांना मारहाण केली होती. आरडाओरडा झाल्यानंतर संशयितांनी कार घेऊन तेथून पळ काढला, अशी तक्रार माने यांनी दिली होती. गुरुवारी कासेगाव पोलिसांनी (kasegaon police thane) तिघांना अटक केली.
राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात वाद झाल्यावर वाळवा तालुक्यातील स्वाभिामानीच्या काही कार्यकर्त्यांसोबत सदाभाऊ खोत आणि त्यांचे पुत्र सागर यांच्याशी कार्यकर्त्यांसोबत नेहमी वाद होत असल्याचे दिसून आले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रवीकिरण यांच्या घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्यावर खोत यांच्यासह काहींनी तेथून पळ काढला. माने यांच्या घरातील लोक जेवत असताना हा प्रकार घडल्याचे माने यांनी फिर्यादीत सांगितले आहे.
सागर सदाभाऊ खोत यांच्याकडे चाकू, अभिजीत भांबुरे यांच्याकडे गुप्ती तर सत्यजीत कदम याच्याकडे तलवार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तुला मस्ती आली आहे का? जिवे मारल्याशिवाय सोडणार नाही, अशी धमकी दिली आहे.