मुंबई : आजकाल बहुतांश जणांना आपण स्लिम म्हणजेच सडपातळ दिसावे, असे वाटते. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. यासाठी अनेक डाएट प्लॅन्सचा दाखला दिला जातो. जसे की, फक्त दहा दिवसांत दहा किलो वजन कमी करा. बरेच लोक विचार न करता हा डाएट प्लॅन फॉलो करायला लागतात. कदाचित तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्ही लवकरात लवकर वजन कमी करू इच्छित असाल. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? की पाच दिवसांत पाच किलो किंवा आठवड्यात आठ किलो वजन कमी करणे अजिबात चांगले मानले जात नाही. (Waight Loss)
जे लोक खूप लवकर वजन कमी करतात त्यांना असे वाटते की, त्यांच्या शरीरातील चरबी कमी होत आहे; तर प्रत्यक्षात तुम्ही फक्त स्नायू आणि पाणी गमावत आहात. फॅट बर्न होण्यास वेळ लागतो आणि एकदा का तुम्ही तुमच्या शरीरातील चरबी काढून टाकली की, ती लवकर परत येत नाही. स्नायू आणि पाणी हे दोन्ही शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरातून स्नायू कमी होतात, तेव्हा त्याचा तुमच्या प्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. तसेच वजन कमी केल्यानंतर तुम्ही स्लिम दिसत नाही.
जेव्हा तुम्ही पाणी कमी करता तेव्हा तुमचे शरीराचे निर्जलीकरण होते. तुम्हाला अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, कामात रस कमी होणे, अशा अनेक समस्या असू शकतात. काही लोक खूप लवकर वजन कमी करतात आणि खूप आनंदी असतात; पण प्रत्यक्षात ते तात्पुरते असते आणि गमावलेले वजन लवकर परत मिळते. म्हणून, तुम्ही एखाद्या निष्णात आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यास सुरुवात करा. एका महिन्यात 3-4 किलोपेक्षा जास्त वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते.
हेही वाचा