नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने भरघोस यश मिळवले. या पार्श्वभूमीवर संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत भाजप आघाडीच्या खासदारांनी सदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत केले. मोदी.. मोदी… असा जयघोष काही मिनिटे सभागृह घुमला. यावेळी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणाही देण्यात आल्या.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाला सोमवारपासून सुरुवात झाली. पंजाब वगळता इतर राज्यात सत्ता कायम ठेवण्यात भाजपला यश मिळाले आहे. पक्षाने याचे बहुतांश श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर संसदेत भाजप आघाडी खासदारांनी पंतप्रधानांच्या नावाचा घोष केला. सदनाबाहेर भाजपच्या खासदार आणि नेत्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे जोरदार स्वागत केले.
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने विजय प्राप्त केला होता. भगवंत मान हे पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते. १६ तारखेला मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला. पंजाबने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविलेली आहे. लोकसभेत नसल्याची जाणीव मात्र सदैव आपल्याला राहील, अशी प्रतिक्रिया मान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. भगतसिंग यांचे जन्मगाव असलेल्या कातरकला गावात मान मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.