पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रशासकीय सेवेचे प्रवेशद्वार असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२३) जाहीर झाला. कठीण आणि आव्हानात्मक असणार्या या परीक्षेत अनेकांनी आपल्या अभ्यासाच्या आणि कष्टाच्या जोरावर बाजी मारली. अशीच एकाने आपल्या जिद्दीच्या जोरावर या परिक्षेच्या माध्यमातून यश खेचून आणलं आहे. त्याच नाव आहे सूरज तिवारी. सुरजला दोन्ही पाय, उजवा हात नाही आहे तर डाव्या हाताची काही बोट नाही आहेत. या कमतरतेचा बाऊ न करता त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षेत यश मिळवले आहे. (UPSC success story )
उत्तरप्रदेश राज्यातील मैनपुरी येथील २६ वर्षीय सूरज तिवारी. याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यशाला गवासणी घातली आहे. त्याच यशाबदद्ल सर्वत्र कौतुक होत आहे. त्याची जिद्द सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे. त्यामागेही खास कारण आहे. २०१७ मध्ये गाझियाबादच्या दादरी येथे झालेल्या रेल्वे अपघातात त्याने आपले दोन्ही पाय तसेच उजवा हात आणि डाव्या हाताची दोन बोटे गमावली. पण त्याने हार न मानता त्याने अभ्यासाला सुरुवात केली.
रेल्वे अपघातात अवयव गमावलेला सुरजसह त्याच्या कुटुंबासाठी तो अत्यंत निराशेचा काळ होता. त्याच वर्षाच्या सुरुवातीला सुरजचा मोठा भाऊ राहुल यांचे निधन झाले. त्याचे वडील शिंपी आणि आई गृहिणी. त्याने अपघातानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) बीएससी अभ्यासक्रम सोडला. सहा महिन्यांनंतर तो पुन्हा निश्चयाने जेएनयूमध्ये परत आला आणि त्याने रशियन भाषेत बीएसाठी प्रवेश घेतला. २०२० मध्ये, त्याने त्याच विषयात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला. पहिल्याच प्रयत्नात तो लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाला पण मुलाखतीत तो काही गुणांनी कमी पडला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातली.
सुरजने माध्यमांशी बोलताना सांगितले की," जिद्द ही यशाची गुरुकिल्ली आहे. दररोज 15-16 तास अभ्यास करण्याऐवजी दररोज फक्त काही तास एकाग्र मनाने अभ्यास केल्यास यश मिळू शकते.
हेही वाचा