नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : मुंबई एपीएमसी कांद्याची 110 गाडी आवक करण्यात आली आहे. बाजार भाव 18 ते 22 रूपये आहे. नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवण्यात आल्याने आवकवर परिणाम झाला आहे. मुंबई एपीएमसीत आज सोमवारी केवळ शेतक-यांनी पाठवलेला कांदा आला आहे. खासगी व्यापा-यांनी खरेदी केलेला कांद्याची शून्य आवक झाली. ही आवक झाली असती तर सुमारे 150 गाडी कांदा मुंबई एपीएमसीत आज विक्रीसाठी येऊ शकत होता.
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 14 बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी व्यापारी असोसिएशनने घेतला होता. मात्र आज सोमवारी प्रत्यक्षात 14 पैकी 10 बाजार समितीत लिलाव सुरू होता. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने आज सकाळी साडे आठ वाजता लासलगाव बाजार समितीत आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी बाजार समितीच्या पाय-यांवर बसून व्यापा-यांनी बघण्याची भूमिका घेतली मात्र आंदोलनात सहभागी झाले नाही. नामपूर, मनमाड, सटाणा पिंपळगाव,वणी,विंचूरसह इतर बाजार समितीत कांदा खरेदी सुरू होती. एकीकडे निर्यातीवरील 40 % शुल्क मागे घेण्यासाठी शेतकरी आक्रमक होत असून दुसरीकडे व्यापारी खरेदी केलेला मालाची निर्यात करणार असेल तर हा शेतक-यांचा विश्वासघात केल्याचा प्रकार आहे. असा आरोप महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण कांदा उत्पादनाच्या 40 % कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दररोज सुमारे दिड ते दोन लाख टन कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला जातो. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीत रोज होते 3 कोटींची उलाढाल होत आहे.
.हेही वाचा