जामखेड : पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणार्या कुकडी डाव्या कालव्यावर 54 गावे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. खरीप हंगामातील आवर्तन नुकतेच पूर्ण झाले असून, ते कमी दाबाने सोडल्याने काही गावातील लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचले नाही. याबाबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधले. रब्बी व उन्हाळी हंगामासाठीा तीन आवर्तनांचे योग्य नियोजन करण्याची विनंती त्यांनी केली. सीना धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सीना धरण लाभक्षेत्रातील शेतकर्यांकडून कुकडी प्रकल्पातून भोसे खिंड येथून पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे कुकडी प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठीचे एकूण तीन आवर्तनाचे योग्य नियोजन व्हावे. सीना कालव्याचे योग्य नियोजन करण्यासाठी कुकडी प्रकल्पातून भोसे खिंड येथून पाणी सोडण्यात यावे.
संबंधित बातम्या :
सीना कालव्याचे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तने सोडावीत, अशी विनंती आमदार पवार यांनी केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला असून, तिसरे आवर्तन सोडण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार सकारात्मक आहेत. येत्या काही महिन्यात त्याबाबतही बैठक ठेवून निर्णय घेतला जाणार आहे.
टेल टू हेड पाण्याची सोय व्हावी
सीना आणि कुकडी हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे आहेत. त्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार 3 डिसेंबरला कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. टेल टू हेड पाण्याची सोय होण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी तीन आवर्तनासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांच्या मागणीला यश आल्यानंतर उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमणात मार्गी लागणार आहे.