नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बिहारमधील विषारी दारुकांड प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून, या प्रकरणाची एसआयटीमार्फत चाौकशी केली जावी, अशा विनंतीची याचिका दाखल झाली आहे. बिहारमधील सारण जिल्ह्यातील अनेक गावांत विषारी दारुमुळे हाहाकार उडालेला आहे. दारुकांडात आतापर्यंत सुमारे ६० लोकांचा मृत्यू झाला आहे.
बिहारमध्ये होत असलेली अवैध दारुची निर्मिती, त्याचा व्यापार आणि विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला जावा. याशिवाय दारुकांडात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जावी, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. एकीकडे सारण जिल्ह्यात हाहाकार उडालेला असतानाच दुसरीकडे सिवान जिल्ह्यातही विषारी दारुकांड घडले आहे. भगवानपूर भागातील सोधनी तसचे ब्रम्हास्थान या गावांमध्ये विषारी दारुच्या सेवनाने चार लोकांचा बळी गेला आहे.