पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चीनी सैन्याने केलेल्या घुसखोरीचे तीव्र पडसाद आज (बुधवारी) देखील संसदेच्या दोन्ही सदनात उमटले. या मुद्द्यावरून सरकारची घेराबंदी करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या विषयावर चर्चा घेण्याची केलेली मागणी सरकारने फेटाळून लावली. त्यानंतर घोषणा देत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी लोकसभेतून सभात्याग केला. India-China border clash
गेल्या आठवड्यात तवांगमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय चौकीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी झालेल्या झटापटीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले होते. ९ तारखेला झालेली ही घटना १२ तारखेला देशासमोर आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी या घटनेची माहिती संसदेत दिली होती. मात्र सिंग यांच्या उत्तरानंतरही विरोधी पक्षांचे समाधान झालेले नाही. संसदेत या विषयावर चर्चा घेतली जावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चीनसोबत कसले संबंध आहेत, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी करतानाच 'जवाब दो, जवाब दो' अशा घोषणा विरोधकांनी सदनात दिल्या. Tawang crisis
तवांगसह अन्य मुद्द्यावर रणनीती निश्चित करण्यासाठी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधी पक्षांची बैठक घेतली. या बैठकीस १५ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. राज्यसभेत खर्गे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारला. चर्चा घेण्याची मागणी उपसभापती हरिवंश सिंग यांनी फेटाळून लावल्याने विरोधी पक्षांनी राज्यसभेतही सभात्याग केला. India-China border clash
हे वाचलंत का?