Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही: पक्ष, चिन्ह आमचेच – सुप्रिया सुळे

Supriya Sule on NCP
Supriya Sule on NCP
नागपूर; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, हे देशातील लहान मुलांना सुद्धा माहीत आहे. ही पार्टी शरद पवारांनी बनवली आहे. तर मग चिन्ह इकडे तिकडे जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. भाजपच्या विरोधात बोललं की, त्याला आईस (IES-इन्कम टॅक्स ईडी सीबीआय) केला जातो. यात आता काही नवल वाटत नाही. तिकडे गेले की स्वच्छ होऊन जातात, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली. (Supriya Sule on NCP)
मराठा लोकांना ओबीसी प्रमाणपत्र संदर्भात वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाबाबत छेडले असता, सरकारी नोकरीमध्ये किती संख्या आहे, हे मला माहित नाही. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यांनी त्यावर उत्तर दिलं पाहिजे. आकडेवारी जी आली ती कोणी आणली? असा प्रश्न उपस्थित करत शेवटी डेटा हा सरकारकडे असतो. आरटीआयच्या माध्यमातून त्याची माहिती मागवता येईल. मात्र, आरटीआय चे उत्तर सुद्धा सरकार देत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. (Supriya Sule on NCP)

Supriya Sule on NCP: सरकारला शेतकऱ्यांसाठी वेळ नाही-सुप्रिया सुळे

शेतकरी प्रश्नी सरकार असंवेदनशील आहे. कांद्याची एवढी मोठी दिल्लीत काल मीटिंग झाली, त्यामध्ये किती मंत्री गेले? एवढा मोठा कांद्याचा विषय असताना, शेतकरी संकटात असताना, यांचे चुकीचे धोरण कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. हे मी चार महिने आधी ट्विट करून पियुष गोयल यांना सांगितलं होतं. जगात कांदा कमी आहे, तिकडे जाऊ द्या, असे मी सांगितलं होतं. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत होते, तेही यांना चांगलं दिसलं नाही. टोमॅटोला दोन पैसे मिळत असताना चुकीचे धोरण स्वीकारले. शेतकऱ्याचं कंबरडे मोडण्याचे पाप जर कोणी करत असेल, तर हे सरकार करत आहे. सरकारला शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, पक्ष फोड, नेते फोड यातच त्यांचा वेळ जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. (Supriya Sule on NCP)
लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना भेटणे आमची जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे प्रश्न समजून घेऊन लढण्याचा प्रयत्न करत असतो. त्या माध्यमातून लोकांशी 365 दिवस संवाद साधत असतो. माझे बरेच दिवस या भागात येणं झालं नाही म्हणून मी नागपूर वर्धा आणि अमरावतीचा दौरा करीत आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आमची लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना भेटण्याची जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडतो. त्यामुळे तीन दिवस विदर्भ दौऱ्यावर आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

महागाई, बेरोजगारी ही राज्य अन् देशापुढील मोठी आव्हाने

दरम्यान, वाघनखावरून राजकारण सूरु आहे. मुळात महाराष्ट्र आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत. एलपीजीचे भाव वाढले आहेत.  पावसामुळे प्रचंड नुकसान झालं, महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. हे सगळे प्रश्न असताना इतिहासकार ज्याप्रमाणे म्हणतात, त्याप्रमाणे ते तज्ञ आहेत. त्यांनी वाघनखं संदर्भात आपले विचार व्यक्त करायला पाहिजे असे सांगितले.  सूरज चव्हाण-इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का? त्यांच्याबद्दल माझ्या ऐकण्यातही नाही आलं आणि वाचण्यातही आलं नाही. मी तुम्हाला रणनीती कशी सांगणार? चर्चा झाल्यावर बघू. अमरावतीला कोण उमेदवार असणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंची दीक्षाभूमीला भेट

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे  तीन दिवसांच्या नागपूर,वर्धा,अमरावती या जिल्हाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज रविवारी दिवसभर स्वागत लॉन सिव्हिल लाइन्स येथे त्या बैठकीत व्यस्त आहेत.  यासोबतच प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. दि १ ते ३ ऑक्टोबर असा तीन दिवसांचा हा विदर्भ दौरा राहणार असून त्यांच्यासोबत पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे प्रदेश पदाधिकारी सुध्दा उपस्थित आहेत. सुप्रिया सुळे यांनी आल्यानंतर दिक्षाभूमीला भेट दिली. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये, प्रदेश सरचिटणीस दिलीप पनकुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
असा असेल खासदार सुप्रिया सुळेंचा विदर्भ दौरा 
खासदार सुळे यांचा रविवारी नागपूर येथेच मुक्काम असून, सोमवारी २ ऑक्टोबरला सकाळी वर्धा जिल्हाच्या दौऱ्यावर निघणार आहेत. त्या सकाळी ९ वाजता पवनार आश्रमाला भेट देणार आहेत.  सकाळी १० वाजता सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देवून गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहेत. दिवसभर बैठकांनंतर अमरावती येथे मुक्कामी जाणार आहेत. मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी खा. सुप्रिया सुळे सकाळी ८.३० वाजता अंबादेवी व एकविरा देवीचे दर्शन घेवून, सकाळी ११ वाजता कॅम्प रोडवर नवीन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचे उध्दाटन करणार  आहेत.  दुपारी १२ वाजता राजापेठ येथील शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उदघाटन करतील.तसेच दुपारी २ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. नंतर त्या नागपूर येथे येवून पुण्याकडे रवाना होणार आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news