ठाणे : पुढारी वृत्तसेवा : सातव्या वेतन आयोगासह एस.टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी एस.टी. कष्टकरी जनसंघाने आज (६ नोव्हेंबर) पासून दिलेल्या संपाच्या हाकेला अन्य कामगार संघटनांनी विरोध दर्शवला आहे. आता कुठे एस. टी. चे गाडे रूळावर येत असतांना ते ही ऐन दिवाळीच्या तोंडावर संप वाढल्यास, चिघळल्यास प्रवाशांचे हाल होण्याबरोबरच महामंडळाचे अर्थकारण पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा एस. टी. फटका बसला आता राज्यातील वाहतूक पूर्वपदावर येत असल्याने पुन्हा संप नको, अशी एस. टी कर्मचाऱ्यांचीही भूमिका आहे. महाविकास आघाडी सरकार असताना एस. टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनकरणसाठी अॅड. सदावर्तनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले होते. लाखो प्रवाशांना वेठीला धरून झालेल्या या आंदोलनाने सदावर्तेच्या संघटनेला साथ देणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. सदावर्ते यांच्या आंदोलनाची हाक म्हणजे लबाडाच्या घरचं निमंत्रण अशी व्याख्या एसटी महामंडळात प्रचलित झाली आहे.
यापुर्वी त्यांनी पाच-सहा महिन्यांचा संप केला आणि संप मागे घेताना न्यायालयाने लेखी ७ वा वेतन आयोग आणि साडेपाच महिन्यांचा पगार मिळेल, पण कामगारांच्या हातात काय आलं? आयोग मिळाला म्हणता मग परत आयोग कसा मागता? असा सवाल महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला. एस.टी. बँकेच्या निवडणुकीत सुद्धा सदावर्ते यांनी खोटी आश्वासने देत कमी व्याजदरात कर्ज देऊ या नावाखाली बँक ताब्यात घेतली पण आत्ता त्याच बँकेची वाट लावल्याचा आरोप त्यांनी केला.
फक्त चमकोगिरी आणि प्रकाश झोतात राहण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा ते वापर करत आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला. गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेने यापूर्वीही एस. टी. चा संप दीर्घकाळ घडवून आणला, त्यावेळी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी अन्य संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला, पण कर्मचाऱ्यांना काही न्याय मिळाला नाही. सदावर्ते यांची सत्ताधाऱ्यांशी जवळीक आहे, त्यामुळे त्यांनी त्यावेळीही कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. आताही त्यांची संपाची हाक ही प्रवाशांची दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आवाहनला भुलू नये, प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले.
हेही वाचा :