नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. झाशीची राणी जशी लढली, तसं मला लढायचं होतं. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, मी शिवसेनेला कधीही सोडणार नाही, मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार असल्याचे शुभांगी पाटील यांनी म्हटले आहे.
40 हजार मते पडणं एक सामन्य घरातील लेकीला विशेष आहे. पाच जिल्ह्याच्या मतदारसंघातून जर मला इतकी मते मिळत असतील तर नक्कीच जनतेचे मी आभार मानते. शिवसैनिकांचे व महाविकास आघाडीचे आभार मानते. मी शिवसैनिक म्हणून लढत होती आणि लढत राहील. झाशीची राणी जशी लढली, मी झाशीच्या राणीच्या पायाची धूळ सुद्दा नाही. पण, झाशीची राणी लढली तसं मला लढायचं होतं. शुभांगी पाटील म्हणाल्या,
एकीकडे मोठी धनसंपत्ती होती, मी तर झोपडी होती. समोर तर फार मोठा बंगला होता. पण, झोपडीनेही तीचे पाय पक्के रोवून ठेवले होते. हे दाखवून द्यायचे होते. चाळीस हजार मते मला मिळाली. यात जुनी पेन्शनचा पराभव झाला. विनाअनुदानित शिक्षकाचा पराभव झाला. लढणा-या हजारो शिक्षकांचा यात पराजय झाला आहे. मी मात्र माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, मी शिवसेनेला कधीही सोडणार नाही.
राज्यभर चर्चेत राहिलेल्या नाशिक पदवीधर निवडणूकीचा निकाल काल उशीरा जाहीर झाला. यात सत्यजित तांबे यांनी मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे.