![Shivsena: तेलगी घोटाळ्याप्रमाणे शिवसेना ठाकरे गट शपथपत्र घोटाळा : सीबीआय चौकशीची शिंदे गटाची मागणी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2F%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ठाणे;पुढारी वृत्तसेवा: मुंबईत सापडलेला बोगस शपथपत्रानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. हा घोटाळा तेलगी घोटाळ्याप्रमाणे आहे, असा आराेप करत मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शपथपत्रांची सीबीआय अथवा सीआयडीमार्फत चौकशी करावी; अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.
शिवसेना आमचीच असल्याचे दावे ठाकरे आणि शिंदे गटांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आले. त्याकरिता दोन्ही गटाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शपथपत्र सादर करण्यात आली. मात्र त्यातील ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेल्या शपथपत्रांमध्ये सुमारे साडेचार हजार बोगस शपथपत्र सापडली असून, त्यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल झाला आहे.
अशी बोगस शपथपत्रे अनेक ठिकाणी बनविण्यात आली असण्याची शक्यता असल्याने, राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून प्रतिज्ञापत्र सादर केलेली असल्याने त्याठिकाणी चौकशी करावी, अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे. आम्ही लोकशाही मानणारे असून, खरी शिवसेना आमचीच आहे. पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे आम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे शिवसेना शाखांचा निर्णय हा स्थानिक शिवसैनिक घेतील, असेही म्हस्के यांनी म्हटले आहे. यावेळी विलास जोशी उपस्थित होते.