पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या २० जागांसाठी तर मिझोराममध्ये ४० जागांसाठी मंगळवारी (दि ७ नोव्हेंबर) मतदान होणार आहे. मात्र, त्याआधीच काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'इंडिया' आघाडीबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "अमित शहा यांनी 'इंडिया' आघाडीची काळजी करण्याची गरज नाही" (Sanjay Raut)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (दि.५) बिहार दौऱ्यावर हाेते. अमित शहा यांनी मुझफ्फरपूर जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले. दरम्यान त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लालू यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला, अमित शाह यांनी नितीशकुमार यांना पलटूराम असे संबोधले. त्याचबरोबर अमित शहा उपहासाने म्हणाले की, "नितीशबाबू, पंतप्रधानपद सोडा, इंडिया आघाडीच्या लोकांनी तुम्हाला निमंत्रकही बनवले नाही.
शहा यांनी इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला राऊत प्रत्यूत्तर दिले आहे. ते म्हणाले की, "अमित शहा यांना 'इंडिया' आघाडीची काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी पाच राज्यांतील निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. 'इंडिया' आघाडीचे नेते सक्षम आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी 'इंडिया' आघाडी झाली आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तिथे काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष आहे. आपण पराभूत न झाल्यास विधानसभा निवडणुकीत भाजप, लोकसभा निवडणुकीची तयारी कशी करणार? पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांच्या बैठका होणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा