नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. राऊत यांच्या घरी या दोन नेत्यांत विविध विषयांवर खलबते झाल्याचे मानले जात आहे. (sambhajiraje meet raut)
संभाजीराजे यांचा राष्ट्रपती नियुक्त खासदारकीचा कार्यकाळ येत्या २ मे रोजी संपत आहे, त्यामुळेही या भेटीला महत्त्व आले आहे. दरम्यान राऊत यांच्याशी झालेली भेट अनौपचारिक होती, त्यात राजकीय चर्चा झाली नसल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.
संजय राऊत हे दरवर्षी मला न चुकता जेवायला बोलावतात. आज मी चहा प्यायला आलो, बाकी काही नाही. दिल्लीचे हेच वैशिष्ट्य आहे. बाकी काही विशेष नाही, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मराठा आरक्षण आणि आंदोलनाबाबत विचारले असता संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत अनेक गोष्टी अडचणीत आहेत. आरक्षणाबाबतचे पाच प्रश्न महाराष्ट्र सरकार सोडवू शकते; पण ते सोडविले गेलेले नाहीत. त्याबाबत मराठा संघटना लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यानुसार आम्ही वाटचाल करणार आहोत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्रातील आघाडी सरकारने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यामुळे देशात कोरोना पसरविण्यास महाराष्ट्र सरकार कारणीभूत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच संसदेत केली होती. या मुद्द्यावर प्रतिक्रिया विचारली असता संभाजीराजे यांनी 'मी त्याच्यावर आताच काही भाष्य करणार नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असून कशावरही बोलत नाही. २ मे नंतर म्हणजे खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर बोलेन" असे सांगितले.
हेही वाचलं का?