![समृद्ध, समर्थ आणि संपन्न भारताचा संकल्प : पंतप्रधान नरेंद्र मोदी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2Fmodi-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : विकसित भारताचा विराट संकल्प पूर्ण करण्यासाठी ही एक मजबूत योजना आहे. हा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देणारा असुन गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीयांची स्वप्ने पूर्ण करणारा आहे. २०४७ पर्यंत समृद्ध, समर्थ आणि प्रत्येक क्षेत्रात संपन्न भारत बनवण्याचा संकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर व्यक्त केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.१) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देताना 2023-24 चा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे सांगितले. सर्वसमावेशक आणि विकसित भारताच्या निर्मितीला चालना देणाऱ्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करत पंतप्रधान म्हणाले की, अर्थसंकल्पात पहिल्यांदाच सरकारने मेहनती आणि सर्जनशील लोकांसाठी एक योजना आणली आहे, जी त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल. खेड्यापासून ते शहरात राहणाऱ्या महिलांच्या राहणीमानात बदल घडवून आणण्यासाठी अनेक मोठी पावले उचलली गेली आहेत. त्यांना आता अधिक ताकदीने पुढे नेले जाईल. या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष बचत योजनाही सुरू करण्यात येत आहे. हा अर्थसंकल्प सहकारी संस्थांना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवेल. नवीन प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना देखील अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :