मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असतानाच शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून घमासान सुरू झाले आहे. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला फैलावर घेतले. रत्नागिरीची जागा आमची हक्काची आहे, ती आम्ही सोडणार नाही, असे सुनावत सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचे आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. (Ramdas Kadam)
कदम म्हणाले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे म्हणे. दोन्ही जागांवर तुम्ही म्हणाल आम्हीच लढणार; पण रत्नागिरीची जागा आमची आहे, ती आम्ही सोडणार नाही. ती आमच्या हक्काची जागा आहे आणि ती आम्ही लढविणारच. आताचे जे खासदार आहेत त्यांची शेवटची सभा सावंतवाडी येथे आपण स्वतः घेतली होती. त्यामुळे सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचे आहे, असा निष्कर्ष यावरून निघेल; पण महायुतीत हे चालणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा