बौद्ध भिक्खूंची वस्त्रही भगवी ; भगवा वादाचे नाही तर शांतीचे प्रतीक – आठवले

file photo
file photo

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

हनुमान चालीसेचे पठण मंदिरात करण्यात हरकत नाही. मशिदीवरचे भोंगे काढा अन्यथा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू ही गुंडा गर्दी योग्य नाही. माझा पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे संरक्षण करणारा आहे. त्यांची भूमिका असंविधानिक पद्धतीची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही भोंगे उतरविण्याची भूमिका घेतली नाही. राज ठाकरेंनी अंगावर भगवी शाल घातली आहे ही चांगली गोष्ट आहे कारण भगवा हे शांतीचं प्रतीक आहे. गौतम बुद्धांच्या काळात बौद्ध भिक्खूच्या वस्त्रांचा रंग हा भगवाच होता. भगवा रंग हा वाद लावण्याचे प्रतीक अजिबात नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी वाद लावू नये  असा सल्लाच रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला.

नाशिकच्या इगतपुरी येथे एका उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी आले असता त्यांनी राज यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. हिंदू मुस्लिम वाद लावण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. मात्र हिंदू मुस्लिमांमध्ये वाद होणे हे देशासाठी फार मोठे नुकसान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी भूमिका मांडत आहे आणि त्यांच्या भूमिकेला छेद देण्याची भूमिका ही राज ठाकरे यांची असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

राज्याच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष 

महाराष्ट्रातील प्रश्नांकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष आहे. ठाकरे सरकार हे वादविवादामध्ये पूर्णपणे अडकले आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचे, रस्त्यांचे, बेरोजगरीचे, दलीत आदिवासींवर होणारे अत्याचारांचे प्रश्न, बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची थकबाकी मिळत नाही असे अनेक प्रश्न आहे ज्या प्रश्नांसाठी सरकारने काम करणे आवश्यक आहे. मात्र मूळ प्रश्न सोडून उत्तरे देण्यात संजय राऊत यांचा वेळ व्यर्थ जातो आहे.  महाराष्ट्राच्या विकासासाठी, कल्याणासाठी जे निर्णय घ्यायला पाहिजे ते निर्णय सरकारकडून घेतले जात नसल्याचे आठवले म्हणाले.

राणा दाम्पत्याची भूमिका चुकीची नाही 

उद्धव ठाकरे यांच्या सभेच्यावेळी राणा दाम्पत्य हे दिल्लीतून हनुमान चालीसा पठण करणार असेल तर त्यांची भूमिका ही चुकीची नाही असे मला वाटते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावणे ही बाब अत्यंत अन्यायकारक होती. त्यांनी मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांना अडवण्याची जबाबदारी पोलिसांची होती त्यांनी अडवलही ते घरातून बाहेरही पडले नाहीत असं असताना त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावणे व पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर अन्याय करणे ही मुंबई पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची होती असे आठवले यावेळी म्हणाले.

पटोलेंना सल्ला 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अनेक वर्षांपासून पटत नाही. कारण पवार साहेबांनी काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. त्यावेळेपासून दोघात अजिबात जमत नाही. पण सत्तेसाठी हे दोघे एकत्र आले आणि शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तेत मश्गूल झालेले आहेत. जर आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे तर आपण त्या सरकारमध्ये का राहतोय.  सरकारमधून काँग्रेस पक्षाने बाहेर पडावे अशा खंजीर खुपसनाऱ्या पक्षाबरोबर राहणे अत्यंत अयोग्य आहे. असे सल्ला त्यांनी पटोले यांना दिला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news