![Raj Thackeray Tweet](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F07%2FRaj-Thackeray-Bhagat-singh-Koshyari.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईमध्ये केलेल्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "मराठी माणसाला डिवचू नका!" असे ट्विट (Raj Thackeray Tweet) करत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर घणाघाती टीका केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शुक्रवारी (२९ जुलै) मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. राज्यपाल म्हणाले होते की, " गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही". या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. जय महाराष्ट्र !
हेही वाचलंत का?