पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रा'ला राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी आर्शीवाद दिले आहेत. सात सप्टेंबर २०२२ रोजी सुरु झालेली ही यात्रा आज उत्तर प्रदेशमध्ये दाखल होत आहे. राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी या यात्रेसाठी राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ( Ramlalas Acharya )
राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात आचार्य दास यांनी म्हटले आहे की, भारत जोडो यात्रा ही आपल्या नावाप्रमाणे देशाला एकसंघ ठेवण्यात यशस्वी होईल. सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे संतु निरामय… या भारतीय परंपरेचे उदाहरण देत त्यांनी म्हटलं आहे की, संपूर्णपणे एकजूट राहिली तरच देश अधिक प्रगती करू शकेल. दहशतवादी आणि फुटीरतावादाशी यशस्वीपणे लढा देता येईल. राहुल गांधी ज्या ध्येयाचा पाठलाग करत आहेत तेही श्री प्रभू रामांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल, असेही ते पत्रात नमूद केले आहे.
भारत जोडो यात्रेला आशीर्वाद याकडे राजकीय समर्थन म्हणून पाहू नये. जो कोणी देशाला एकत्र आणण्याची भाषा करतो त्याला रामललाचे आणि आमचे आशीर्वाद आहेत, असे आचार्य सत्येंद्र दास यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आशीर्वाद देणाऱ्यांमध्ये जानकी घाट बडा स्थानाचे महंत जनमेजय शरण यांचाही समावेश आहे. त्यांनी म्हटले आहे की, "आज भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी करत असलेले काम भारतमातेवर प्रेम करणाऱ्या राजकारण्यांनी केले पाहिजे. त्यांच्या या प्रयत्नाचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. आमच्या आशीर्वादांना राजकीय दृष्टीकोनातून पाहणे योग्य नाही."
संतांनी राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेला आशीर्वाद दिल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते गौरव तिवारी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी संत आणि सनातन संस्कृतीची मूल्ये वापरत आहे. मात्र हीच मूल्ये राष्ट्रीय संदर्भात तटस्थपणे मांडायची असतील तेव्हा त्यांना याचा विसर पडतो. नागरिकांनी भाजपची संकुचित मानसिकता आणि राजकीय फायद्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या जात आहेत हे समजून घेतले पाहिजे."
हेही वाचा :