Kapil Dev : रोहित-विराट विश्वचषक जिंकून देतील अशी अपेक्षा करू नका : कपिल देव | पुढारी

Kapil Dev : रोहित-विराट विश्वचषक जिंकून देतील अशी अपेक्षा करू नका : कपिल देव

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्मा (rohit sharma) आणि विराट कोहली (virat kohli) हे टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देतील अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असे भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी म्हटले असून त्यांच्या या विधानानंतर खळबळ उडाली आहे. विश्वचषक जिंकायचा असेल तर टीम इंडियाचे प्रशिक्षक, निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यांनी संघाच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

‘जर तुम्हाला विराट (virat kohli), रोहित (rohit sharma) किंवा इतर 2-3 खेळाडूंवर विश्वास असेल की ते आम्हाला विश्वचषक जिंकून देतील, पण असे कधीही होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या संघावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याकडे अशी टीम आहे का? आपल्याकडे मॅच विनर्स आहेत का? असे प्रश्न मला विचाराल तर त्याचे उत्तर मी होय असेच देईन. मला विश्वास आहे की, भारतातील युवा फलंदाजांकडे देशाला विश्वचषक जिंकून देण्याची क्षमता आहे, फक्त त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. संघ व्यवस्थापनाने याकडे लक्ष दिले पाहिले,’ असा टोलाही कपिल देव यांनी लगावला.

‘संघासाठी नवे आधारस्तंभ तयार करा’

कपिल म्हणाले, रोहित आणि विराट यांनी त्यांचे काम केले आहे, आता युवा खेळाडूंनी पाऊल उचलून संघाला पुढे नेण्याची वेळ आली आहे. काही खेळाडू असे असतात जे तुमच्या संघाचे आधारस्तंभ बनतात. संघ त्यांच्याभोवती फिरतो, पण आपल्याला ही व्यवस्था मोडून काढावी लागेल आणि नव्याने किमान 5-6 खेळाडू तयार करावे लागतील. पण असे होऊ शकत नाही. आपण अजूनही विराट आणि रोहितवर अवलंबून आहोत. आता बदलाची वेळ आली आहे. संघ व्यवस्थापना अशा खेळाडूंची गरज आहे जे रोहित विराटची प्रत्येक जबाबदारी पार पाडतील. युवा खेळाडूंनीही पुढे येऊन ‘ही आमची वेळ आहे’ असे ठणकावून सांगायला हवे.’

विराट-रोहित युवा खेळाडूंच्या फिटनेसशी स्पर्धा करू शकतील का?

‘रोहित यंदा 36 वर्षांचा, तर कोहली 35 वर्षांचा होईल. पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणे या दोन्ही दिग्गजांसाठी कठीण काम असेल. सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे विश्वचषक भारतात होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे पारडे जड आहे. गेल्या 8-10 वर्षांपासून रोहित आणि विराट हे भारताचे दोन महत्त्वाचे क्रिकेटपटू आहेत. अनेक जण विचारू लागले आहेत की, विराट आणि रोहितचा हा शेवटचा विश्वचषक असेल का? मला विश्वास आहे की ते दोघेही खेळू शकतील पण त्यांना खूप मेहनत करावी लागेल. पण फिटनेस महत्त्वाची भूमिका बजावेल. बरेच युवा खेळाडू पुढे येत आहेत. अशात विराट-रोहित त्यांच्याशी स्पर्धा करू शकतील का?,’ असाही प्रश्न कपिल यांनी उपस्थित केला.

कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) यांनी गेल्या जवळपास दशकभरात भारतीय क्रिकेटला खूप काही दिले आहे. त्यांनी महत्त्वपूर्ण प्रसंगी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तसेच नियमितपणे धावा करत संघात स्वतःचे अढळस्थान निर्माण केले. मात्र, गेल्या काही काळापासून या दोन फलंदाजांच्या बॅटमधून म्हणाव्या तशा धावा येत नाहीत. रोहितने दोन वर्षांहून अधिक काळ वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावलेले नाही. दुसरीकडे कोहलीने डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात वन डे शतकासाठी 36 महिन्यांची प्रतीक्षा संपवली.

Back to top button