![Rahul gandhi at The Conclave 2023 in Delhi](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2FRahul-gandhi.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजप सर्वसामान्यांचे मूळ मुद्यांवर लक्ष विचलित करून निवडणुका जिंकतो, हा महत्त्वाचा धडा आम्ही कर्नाटक निवडणुकीत शिकलाे. म्हणूनच कर्नाटकात आम्ही काय केले, याची भाजपला व्याख्या करताच आली नाही, अशा पद्धतीने आम्ही निवडणुका लढवल्या, असे स्पष्ट करत या वर्षी पाच राज्यांमध्ये हाेणार्या विधानसभा निवडणूक निश्चितपणे जिंकू, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. ते दिल्लीतील मीडिया नेटवर्कच्या 'द कॉन्क्लेव्ह 2023' कार्यक्रमात बोलत होते.
'तुम्ही आज बघत आहात, बिधुरी आणि मग अचानक हे निशिकांत दुबे, हे सगळे भाजप जात जनगणनेच्या कल्पनेवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील कोणत्याही उद्योगपतीला विचारा की, त्यांनी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला तर त्यांचे काय होते. त्यामुळे आम्ही आर्थिक संकटाचा आणि प्रसारमाध्यमांच्या हल्ल्याचा सामना करत आहोत. आम्ही सध्या कोणत्या राजकीय पक्षाशी लढत नाही.आम्ही भारताच्या वैचारिक वारशाच्या संरक्षणासाठी लढत आहोत. म्हणून आम्ही आमच्या विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव इंडिया ठेवले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
या वर्षी राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या ५ राज्यांपैकी राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. तेलंगणात केसीआर आणि टीआरएस आणि मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता आहे. निवडणूक आयोग या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर करू शकते. या राज्यांतील निवडणुका डिसेंबरपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या ५ राज्यांचे निकाल काँग्रेस पक्षांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचे काम करतील असा विश्वास देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.