पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचे नवे राष्ट्रपती निवडण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने आज (दि. १७) राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी व्यवस्थापन समितीची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा समावेश केला आहे.
आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून आज १४ सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना समितीचे समन्वयक म्हणून नेमण्यात आले आहे. विविध राज्यांतील पक्षाच्या प्रदेश शाखा तसेच रालोआतील सहयोगी पक्षांनी संवाद साधणे. तसेच निवडणुकीसाठी पात्र असलेल्या मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देणे ही जबाबदारी समन्वय समितीवर सोपविण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सी. टी. रवी व तरुण चुघ यांना समितीचे सहसमन्वयक बनविण्यात आले आहे. समितीत सदस्य म्हणून ज्यांना घेण्यात आले आहे. त्यात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भारती पवार, जी. किशन रेड्डी, सर्वानंद सोनोवाल आणि अर्जुन मेघवाल यांचा समावेश आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. के. अरुणा, राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाती श्रीनिवासन तसेच राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनादेखील समितीत संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा २१ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी भाजपने पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. याबाबतची घोषणा रविवारी करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?