PM Modi : दिशाभूल करण्यासाठीच इंडिया आघाडीचे अस्तित्व; पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

PM Modi
PM Modi

सिकर; वृत्तसंस्था : PM Modi  संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) जनतेची दिशाभूल करण्यासाठी आघाडीचे नाव इंडिया केले असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत बोलताना केली.

राजस्थानातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचा या सभेत समाचार घेतला. संपुआच्या काळातील भ्रष्टाचार आणि गरिबांवर झालेला अन्याय लपविण्यासाठीच विरोधी आघाडीने संपुआचे नामकरण केले आहे. विरोधकांच्या तकलादू इंडिया नावावरून आपल्याला महात्मा गांधी यांच्या क्विट इंडिया (चलेजाव) घोषवाक्याची आठवण झाली. महात्मा गांधी यांच्या नार्‍यानंतर ब्रिटिशांना देशातून जावे लागले होते. त्याच धर्तीवर घराणेशाहीचे राजकारण करणार्‍या भ्रष्टाचारात बरबटलेल्या करप्ट क्विट इंडिया आघाडीला हाकलून लावण्याची गरज आहे. (PM Modi)

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला रेड डायरीतील हिशेब चुकता करावा लागेल. रेड डायरीतील भ्रष्टाचारावरून मतदारच काँग्रेसला निवडणुकीत धडा शिकवतील. डिसेंबरमध्ये होणार्‍या निवडणुकीत भ्रष्टाचारी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकल्यास राजस्थानची भरभराट होईल, अशी मी आपणास ग्वाही देतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या नऊ वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. देशात 1.25 लाख पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र स्थापन केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रेड डायरीला रेड टोमॅटोचा टोला

सिकर येथील सभेला आजारी असल्याचे सांगून गेहलोत उपस्थित राहू शकले नाहीत. रेड डायवरील टीकेला प्रत्युत्तर देताना मोदी यांनी रेड टॉमेटोच्या किमती का वाढल्या ते सांगावे, असा टोला गेहलोत यांनी दिला.

17 हजार कोटींचा हप्ता जाहीर

पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रामध्ये शेतकर्‍यांना बी-बियाणे खते, औजारे उपलब्ध करून देण्यात येतील. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांसाठी मोदींनी 17 हजार कोटींचा हप्ताही जाहीर केला.

   हेही वाचलंंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news