![नवाब मलिक](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F09%2F14-18.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीत, त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. मलिक हे गेल्या काही दिवसांपासून मनी लॉड्रिंग केसप्रकरणी अटकेत आहेत. यानंतर ईडीला मलिक यांची संपत्ती जप्त करण्यास परवानगी मिळाली असल्याने, या निर्णयाने मलिक यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे.
नवाब मलिक यांची मुंबईतील कुर्ला येथील गोवावाला कॉम्पेक्ससह, कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिममधील दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद येथील शेतजमिनीवर कारवाई करण्याची परवानगी ईडीला देण्यात आली आहे. ही मालमत्ता ताब्यात घेण्याची पवानगी ईडीला मिळाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
अलीकडेच नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कुर्ला येथील रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांच्यावर किडनीशी संबंधित आजार आणि इतर आरोग्य समस्यांवर उपचार सुरू आहेत. त्यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेची विक्री आणि मनी लाँड्रिंगमध्ये या प्रकरणी ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.