पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये जदयूने (जनता दल युनायटेड ) भाजपशी काडीमोड घेत 'राजद'सोबत ( राष्ट्रीय जनता दल ) नवा घरोबा केला आहे. आज जदयूचे नेते नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर सर्वप्रथम त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला.
नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची आठव्यांदा शपथ घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, " आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत आमचे काय होईल माहिती नाही;पण २०१४मध्ये विजयी झालेले सत्तेत राहणार नाहीत. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी मी कधीच दावा केलेला नाही. आम्ही समविचारी पक्षांबरोबर चर्चा करुनच निर्णय घेणार आहोत. आम्ही विरोधी पक्ष मजबूत करणार आहोत."
काहींना वाटते की विरोधी पक्ष पूर्णपणे संपेल. आता आम्ही विरोधी पक्षात आलो आहोत, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना लगावला. जेपी नड्डा यांचा नुकताच बिहार दौरा झाला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं होते की, देशभरात प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपत आले आहे. जे प्रादेशिक पक्ष संपलेले नाहीत त्यांचे अस्तित्व लवकरच संपेल. केवळ भाजप हाच पक्ष राहील.
हेही वाचा :