पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत चंद्रावर पोहोचलाय. G-20 परिषदेचे यजमानपद भूषवत आहे आणि आम्ही जगाकडे पैशासाठी भीक मागत आहे, अशी शब्दांमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांनी आपल्याच देशाची लक्तरे जगासमोर मांडली आहेत. सोमवारी ( दि.१८) व्हिडिओ लिंकद्वारे लंडनहून लाहोरमध्ये पक्षाच्या सभेला संबोधित करताना त बोलत होते.
या वेळी नवाझ शरीफ म्हणाले की, पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांपासून डबघाईला आली आहे. अनियंत्रित चलनवाढीमुळे गरीब भरडले जात आहेत. आज पाकिस्तानचे पंतप्रधान एका देशात जाऊन पैसे मागतात, तर भारत चंद्रावर पोहोचला आहे. जी-20 परिषेदचे यजमानपद भूषवत आहे. भारताने जे साध्य केले ते पाकिस्तान का साध्य करू शकले नाही? याला जबाबदार कोण?, असा सवालही त्यांनी केला.
भारताने १९९० मध्ये आर्थिक सुधारणा धोरणाची अंमलबजावणी केली. अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा भारताकडे फक्त एक अब्ज डॉलर्स होते; पण आता भारताचा परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलर्स झाला आहे.' भारत आज कुठे पोहोचला आहे आणि काही रुपयांसाठी जगाला भीक मागणारा पाकिस्तान का मागे राहिला आहे, असा सवालही नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांनी केला.
आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) यावर्षी जुलै महिन्यात नऊ महिन्यांसाठी तीन अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेज अंतर्गत पाकिस्तानला $1.2 अब्जची रक्कम हस्तांतरित केली होती. आगामी निवडणुकीत पक्षाच्या राजकीय प्रचाराचे नेतृत्व करण्यासाठी नवाझ शरीफ यांनी २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये परतण्याची घोषणा केली आहे.
अल अझिझिया मिल्स भ्रष्टाचार प्रकरणी नवाझ शरीफ यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी वैद्यकीय कारणास्तव त्यांना देश सोडण्यास मदत केली. तेव्हापासून शरीफ हे इंग्लंड येथे वास्तव्यास आहेत.
हेही वाचा :