नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राजधानी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात असलेल्या प्राचीन हनुमान मंदिरात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा यांनी शनिवारी आरती करीत हनुमान चालीसा पठण केले. राणा दाम्पत्यांनी हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा करीत सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी भगवे झेंडे हाती घेवून त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. 'जय श्रीराम' नामाचा जयघोषही यावेळी समर्थकांकडून करण्यात येत होता.
सकाळी साडे नऊच्या सुमारास राणा दाम्पत्याने नॉर्थ एव्हेन्यू येथील त्यांच्या राहत्या घरापासून पदयात्रा सुरु करीत जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेले हनुमान मंदीर गाठत आरती आणि हनुमान चालीसा पठण केले. महाराष्ट्रातील सर्वात मोठे संकट म्हणजे, उद्धव ठाकरे यांचे सरकार असून महाराष्ट्र संकटमुक्त करण्याचे साकडे घालण्यासाठीच हनुमान चालीसा पठण करीत असल्याची प्रतिक्रिया यावेळी नवनीत राणा यांनी व्यक्त केली.
महिलांना घाबरवून जेलमध्ये डांबणे मान्य नसून अशा वर्तनाला घाबरणार नाही, थकणार नाही. देशातील स्त्रीया एवढ्या कमकुवत मुळीच नाहीत. महाराष्ट्रातील शकुनी आणि अपशकुनी संकट दुर करण्याासाठी आरती केल्याची भावना यावेळी नवनीत राणा यांनी व्यक्त केली.
हेही वाचलंत का?