नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील मानोरी (बु.) येथील मूळचे रहिवासी असलेल्या जवानाला गंगानगर, राजस्थान येथे कर्तव्यावर असताना अपघाती वीरमरण आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अजित गोरख शेळके (29) असे या जवानाचे नाव आहे. ते 54 अरमाड बटालियनमध्ये कार्यरत होते. ड्यूटीवरून घरी जात असताना युनिटमध्येच अपघात होऊन त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवारी (दि. 18) सायंकाळी त्यांना वीरमरण आले. प्रशासनाकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू होते. शेळके यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. शेळके यांचे पार्थिव आज येण्याची शक्यता आहे.