नाशिक (पेठ) : शिळे अन्न खाल्याने विषबाधा होऊन बारावर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भुवन येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भुवन येथील दरोडे कुटुंबातील नेहा जानू दरोडे (12) आणि तिच्या भावंडांनी घरी शिजवलेले शिळे अन्न खाल्ल्याने त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना औषधोपचारासाठी पेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान नेहाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबतचा अहवाल कार्यकारी दंडाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सी. आर. भुसारे अधिक तपास करीत आहेत.