![श्रीकांत शिंदेंचा ‘अविश्वास’वरील चर्चेवेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, “अडीच वर्षात…”](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F08%2FUntitled-design-2023-08-08T152346.743.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : "गेल्या अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचं रेकॉर्ड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं," अशी टीका शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सरकारच्या बाजूने ते बोलत होते. या वेळी श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना विरोध केला जातो, असे म्हणत सभागृहातच हनुमान चालिसाचे पठण केले.
खासदार शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात अनेक रेकॉर्ड बनली आहेत. मुंबईत कारशेडचं काम पर्यावरणाच्या नावाखाली होऊ दिलं नाही. पायाभूत सुविधांची कामे थांबवण्यात आली. केंद्र सरकारच्या योजना रखडल्या. गृहमंत्री अमित शहा यांना गद्दार लोकांध्ये बसले, असे म्हणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, २०१९ मध्ये कोणाचा फोटो लावून निवडणूक लढवली. जनतेने भाजप- शिवसेनेला कौल दिला होता. मात्र मतदानानंतर मुख्यमंत्री व्हावं वाटलं, बाळासाहेबांचे विचार काय आहेत ते विसरला. शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही, जर अशी वेळ आली तर मी माझ दुकान बंद करेन,' असे बाळासाहेब ठाकरे म्हणत; पण यांनी महाराष्ट्रात अनैतिक सरकार बनवलं, असा आरोपही त्यांनी केला.
एकेकाळी महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाचण्यास बंदी होती. या महिला खासदाराने तुम्हाला हनुमान चालीसा माहीत आहे का, असा सवाल केला. असा सवाल केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी सभागृहातच हनुमान चालिसाचे पठण करण्यास सुरुवात केली. त्यांनी सुमारे ३० सेकंद हनुमान चालिसाचे पठण केले.
२०१८ मध्येच पंतप्रधान मोदींनी विरोधक २०२३ मध्ये अविश्वास ठराव आणतील असे सांगितले होते. २०१९ मध्ये २०१४ पेक्षा अधिक खासदार निवडून आले. तसे २०२४ मध्येही ४०० हून अधिक खासदार विजयी होतील, असा विश्वासही यावेळी शिंदेंनी व्यक्त केला. आजअविश्वास विरूद्ध जनविश्वास अशी चर्चा आहे. देशातील जनतेचा विश्वास पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहे. विरोधकांना 'युपीए' नावाची लाज वाटते म्हणून नाव बदललं. युपीएच नाव घेतल्यानंतर लोकांना भ्रष्टाचार आठवतो; पण इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय निश्चित होत नाही, असा टाेला लगावत २०२४ मध्ये मोदींचाच विजय होणार, असाही त्यांनी व्यक्त केला. आज देश मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आतंकवाद्यांसमोर देश झुकणार नाही, हा संदेश जगात गेला आहे, असेही खासदार शिंदे म्हणाले.
हेही वाचा :