शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : करंदी (ता. शिरूर) येथील संकल्प इंजिनिअरिंग ही कंपनी महाराष्ट्र प्रशासनाचा जाच व स्थानिक आंदोलनाला कंटाळून गुजरातला स्थलांतरित होण्याचा विचार करत आहे. यामुळे सुमारे एक हजारांहून अधिक कामगार बेरोजगार होण्याची शक्यता असून यामध्ये स्थानिक कामगारांची संख्या ही तब्बल 70 टक्के आहे. कंपनी स्थलांतरित झाल्यास करंदी व आजूबाजूच्या परिसरातील गावांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे. या कंपनीतील सुमारे 700 कामगार कायम असून, त्यांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
स्थानिक कामगारांची परिसरात शेतीवाडी व घरे आहेत. कुटुंब, मुलांचे शिक्षण, स्थावर मालमत्ता सोडून राजकोट येथे नोकरी करणे त्यांना अवघड जाणार आहे. करंदी तसेच चाकण-शिक्रापूर रस्त्यावर असलेल्या अनेक व्यवसायांवर याचा गंभीर परिणाम होणार आहे.
या कामगारांनी करंदीत सुमारे 300 खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. यामुळे इमारत मालक तसेच भाजीपाला व्यावसायिक, हॉटेल, सलून, स्थानिक वाहतूकदार, किराणा दुकानदार, पानटपरीवाले, चिकन सेंटर, अशा व्यावसायिकांनाही मोठा फटका बसणार आहे. शिवाय परिसरातील पाच गावांमधील अर्थकारणावरही परिणाम होणार आहे. या कंपनीतील 20 टक्के कामगार परप्रांतीय असून त्यांचीही रोजीरोटी जाण्याची भीती आहे.
करंदी ग्रामपंचायतला कंपनीच्या माध्यमातून सुमारे पाच लाख रुपयांचा वार्षिक कर मिळत आहे. कंपनी बंद झाल्यास हा कर मिळणार नाही. या कंपनीमध्ये वाहतूक, पाणी, लेबर, लोडिंग, अनलोडिंग इत्यादी कामे करणारे सुमारे 15 स्थानिक ठेकेदार आहेत. यामुळे त्यांचा व्यवसायही बंद पडू शकतो. त्यामुळे संकल्प इंजिनिअरिंग गुजरातला जाणार असल्याच्या वृत्ताने स्थानिकांमध्ये संतप्त भावना आहे. गावात असलेला हा प्रकल्प बाहेर जाऊ नये, अशी स्थानिकांची भावना आहे.
कंपनी स्थलांतराविरोधात स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा
संकल्प इंजिनिअरिंग कंपनीच्या स्थलांतरास स्थानिकांचा विरोध असून यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ आंदोलन छेडतील. प्रशासनाने कंपनीच्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा. कुणी उपोषण करून दबाव आणत असेल तर त्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. कंपनीच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करू, असे करंदीच्या सरपंच शारदा ढोकले व माजी उपसरपंच चेतन दरेकर यांनी सांगितले.
हेही वाचा :