पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील विधानसभा निवडणुकांसाेबतच महाराष्ट्रातही मध्यावती निवडणूका होवू शकतात, अशी शक्यता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज व्यक्त केली. राज्यात धार्मिक राजकारण करुन जातीय तेढ निर्माण केली जातेय. देशात रक्तरंजित राजकारण होत आहे, असा आराेपही त्यांनी केला.
या वेळी संजय राऊत म्हणाले, शरद पवारांनी व्यक्त केलेल्या भाकीताप्रमाणे गुजरातसोबत महाराष्ट्रात मध्यावती निवडणूका होवू शकतात. गटनेतापद आणि व्हिपच्या मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले की, पक्षाच्या विरुद्ध कारवाई केली म्हणून शरद यादव यांंचं राज्यसभेतून निलंबन केलं. देशात कायदा समान असतो; पण एकच कायदा वेगवेगळ्या आपल्या हेतूनुसार वापरला जाताे, याला लोकशाही म्हणायची का? असा सवालही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ हे पदावर असताना दिलेला निर्णय दुसरी सत्ता आल्यावर कसा काय बदलतो? जे काही सुरु आहे ते लोकशाहीला सुसंगत नसल्याचे ते म्हणाले. देशात न्याय हा सोईनुसार आणि मर्जीनूसार दिला जात असल्याचा आराेपही त्यांनी केला.
मूळ पक्ष हा शिवसेना आहे. पक्षाच्या चिन्हावर हे बंडखोर आमदार लोक निवडून आले आहेत. ते भाजपसाेबत गेले असले तरी शिवसेना अजूनही मजबूत आहे. लोक सोडून गेल्याने पक्ष कमजोर नाही झालेला. गावागावात, मनानात शिवसेना आहे. या राज्याची जनता शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा झालेला अपमान कधीही सहन करणार नाही. बंडखोरांनी असा निर्णय का घेतला त्यांना माहीत आहे. त्यांनी स्वत: लाही विचारावे का घेतला हा निर्णय. असे म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
भारतीय जनता पक्षाला फक्त शिवसेना फोडायची होती. ते त्यांनी करुन दाखवले. शिवसेना फोडून फुटीर नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले. शिवसेना पक्ष पुन्हा फोडण्याचा प्रयत्न केला गेला; पण शिवसेना पुन्हा उभा राहते. शिवसेना कागदावर कमजोर झाली आहे जमिनीनर अजूनही मजबूत आहे, असेही ते म्हणाले. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्राचे तीन भाग केले जाणार आहेत आणि त्यातील एक भाग हा मुंबई असणार आहे. मुंबईच्या धनसत्तेवर काहींचा डोळा आहे, असा आराेपही त्यांनी केला.
हेही वाचलंत का?