सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : अपुर्या अनुदानामुळे शेतकर्यांना शेततळे करण्यासाठी अडचणी येत होत्या. पावसाचेही सातत्य नसते, त्यामुळे शासनाने शेततळे अनुदानात वाढ करून ते 75 हजार रुपये करण्यात आले आहे.
ऐन पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने शेती पिकांना मोठा धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत शेतातील उभ्या पिकांवर ताण पडल्यास हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होते. यावर उपाय योजना करण्यासाठी म्हणून जेव्हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो अशावेळी ओढे, नाले, नदीव्दारे वाहून जाणारे पाणी उपसून ते तलाव, विहीर यातून उपसा करुन शेततळ्यांमध्ये साठवण्यात येते. मात्र शेतकर्यांना या शेततळ्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भरीव आर्थिक साहाय्य करण्यासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. त्यामुळे शासनाने 2022-23 या आर्थिक वर्षात अर्थमंत्र्यांनी शेततळ्याच्या अनुदानामध्ये किमान 50 टक्के वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला दिला होता. तो प्रस्ताव आता मान्य करण्यात आला असून शेतकर्यांना आता शेततळ्यासाठी किमान 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये वैयक्तिक शेततळ्यासाठी हे अनुदान मिळणार आहे, तर दुसरीकडे या घटकाची महाडिबिटी प्रणालीव्दारे तालुकानिहाय ऑनलाईन सोडतीव्दारे लाभार्थ्यांची निवड करुन योजनेची अंमलबजावणी करावी तसेच शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अनुदान थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावे, अशा सूचना शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे यामध्ये रोजगार हमी योजनेची सांगड घालून ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.