नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ४० दिवसांच्या अल्टीमेटमनंतरही सरकारने मराठा आरक्षणासाठी कुठलेच पावले उचलली नसल्याने, सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण कायम ठेवले आहे. जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेल्या ४२ दिवसांपासून उपोषण सुरू असून, आता मराठा बांधवांकडून आरक्षणाबाबत खेड्यापाड्यात जनजागृती केली जात आहे. या उपोषणाला जिल्ह्यातील अनेक संघटनांकडून पांठिबा दर्शविला जात आहे. (Maratha Reservation)
मराठा नेतृत्व मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाचा पुन्हा एकदा निर्धार केल्यानंतर साखळी उपोषण स्थगित न करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने घेण्यात आला. या उपोषणस्थळी रोजच संस्था, गावकरी, विविध समुदायातील मंडळी भेटी देत असून, लेखी पाठिंबा दर्शवित आहेत. आतापर्यंत ४५० पेक्षा अधिक पाठिंब्याचे पत्र प्राप्त झाले आहे. हे सर्व पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविणार आहेत. सध्या गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदीचे निर्णय घेतले जात आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खान्देशसह नाशिक जिल्ह्यातील सुमारे शंभरपेक्षा अधिक गावांनी नेत्यांना गावबंदीचे फलक लावले आहेत. (Maratha Reservation)
साखळी उपोषणात नाना बच्छाव, राम खुर्दळ, चंद्रकांत बच्छाव, नितीन रोटे-पाटील, अॅड. कैलास खांडबहाले, अॅड. तुषार जाधव, डॉ. अजित तिदमे, शिवव्याख्याते नितीन डांगे-पाटील, विकी गायधनी, विकी देशमुख, प्रकाश चव्हाण, गणेश पाटील, महेंद्र बेहेरे, संदीप खुटे, ज्ञानेश्वर कवडे, संजय देशमुख, राम निकम, राम गहिरे, योगेश कापसे, डॉ. देवरे, डॉ. विठ्ठल गाजरे, संजय फडोल, रवि बोसरे, ज्ञानेश्वर कवडे, रोहिणी उखाडे, कृष्णा धोंडगे, शिवाजी धोंडगे, रामदास पिंगळे आदींनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्यात पाच कोटींपेक्षा अधिक मराठा बांंधव सहभागी आहेत. मराठा समाज गेल्या ४० वर्षांपासून आरक्षणासाठी लढत आहे. मात्र, सर्वांनीच मराठा समाजाशी दगाफटका केला आहे. त्यामुळे आता निर्वाणीचा लढा लढत आहोत.
– नाना बच्छाव, उपोषणकर्ते
उपेक्षित मराठ्यांना निष्ठा व अभ्यास असलेले सामान्य नेतृत्व मनोज जरांगे-पाटील यांच्या रूपाने मिळाले आहे. मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी ते जीवाचे रान करीत आहेत. मात्र, अजूनही आंधळे, बहिरे मराठाविरोधी सत्ताधारी-विरोधक मराठ्यांना झुलवत आहेत.
– प्रफुल्ल वाघ
—
हेही वाचा :