![Manipur Internet Update](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2Fmanipur.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Internet Update : मणिपूरमध्ये मे महिन्यात हिंसाचार सुरू झाल्यानंतर मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. जवळपास साडेचार महिन्यांनी सर्व सामान्यांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा आजपासून पुन्हा सुरू होत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी शनिवारी राज्यात इंटरनेट सेवा पुन्हा पूर्ववत करण्याची घोषणा केली.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री सिंग यांनी मणिपूरची राजधानी इंफाळ येथे आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आजपासून मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा जनतेसाठी खुली केली जाईल, अशी घोषणा केली. यापूर्वी जुलैमध्ये मणिपूर सरकारने राज्यात ब्रॉडबँड सेवा सशर्त पुनर्संचयित करण्याची घोषणा केली होती. मात्र, राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.
मोबाईल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यापूर्वी शुक्रवारी मणिपूर सरकारने राज्यातील सर्व लोकांना बेकायदेशीर शस्त्र 15 दिवसात जमा करण्याची मूदत दिली आहे. याविषयी मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे.
या निवेदनात मणिपूर सरकारकडून स्पष्टपणे अल्टिमेटम देण्यात आला आहे. यात म्हटले आहे की बेकायदेशीर शस्त्रांचे 15 दिवसांत समर्पण करावे. शस्त्रे जमा करणाऱ्यांबाबत सरकार विचार करेल. अन्यथा 15 दिवसानंतर पुढील कारवाईसाठी तयार राहावे.
15 दिवसानंतर केंद्र आणि राज्य दोन्ही सुरक्षा दले अशी शस्त्रे जप्त करण्यासाठी राज्यभर एक मजबूत आणि व्यापक शोध मोहीम हाती घेणार आहे. त्यानंतर बेकायदेशीर शस्त्रे आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.
राज्य सरकारला अनुसूचित जमाती (एसटी) च्या श्रेणीमध्ये मेईतेई समुदायाचा समावेश करण्याबाबत विचार करण्यास सांगणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कुकी आणि मेईतेई समुदायांनी केलेल्या निदर्शनानंतर मणिपूरमध्ये 3 मे पासून हिंसाचार सुरू झाला होता.
या हिंसाचारात अनेकांचा बळी गेला. कित्येक कुटुंब उद्धवस्त आणि बेघर झाली. तर महिलांवर अनेक लैंगिक अत्याचार करण्यात आले. यानंतर मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ती आजपासून पूर्ववत करण्यात येत आहे.
हे ही वाचा :