पुढारी ऑनलाईन डेस्क : आज राज्यातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्हाला कायद्याच्या चौकटीत न्याय मिळेल. आमची बाजू न्यायाची आणि सत्तेची आहे. आम्ही सत्याची मागणी करतोय. त्यामुळे आम्ही सर्व प्रकारच्या लढाईसाठी तयार आहोत. देशात लोकशाही, न्यायव्यवस्था आहे की नाही? हे आता सत्तासंघर्षाच्या खटल्यातूनच सिद्ध होईल असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत पत्रकारांशी दिल्लीत बोलत होते.
पुढे ते म्हणाले, सध्या जे घटनाबाह्य सरकार राज्यात कार्यरत आहे ते राज्याच्या आणि देशाच्याही हिताचे नाही. राज्य, देशातील हेच सरकार स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे आदर्श जगासमोर निर्माण करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या तारखांना सामोरे जात आहोत. तारखांवर तारखा पडतायत त्यामुळे सध्याचे सरकार मिश्कीलपणे हसत आहे. त्यांना त्यांच्या पाठीमागे एक शक्ती असल्याचे वाटतेय, पण आमचा न्यायव्यस्थेवर विश्वास आहे. या खटल्याचा निकाल कधीच लागायला पाहिजे होता, पण फेब्रुवारीपर्यंत याचा निकाल लागेल याची आम्हाला अपेक्षा असल्याचे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केली.
सत्तेतील राज्य सरकारचा मृत्यू अटळ आहे. हे सरकार म्हणजे मुडद्यात प्राण फुंकलेले सरकार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या फेब्रुवारीपर्यंत निकालानंतर हे घटनाबाह्य राज्य सरकार नक्कीच पडेल असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. राहूल गांधींची भारत जोडो यात्रा ही राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे. या यात्रेला अनेक विरोधी पक्षाकडूनही पाठींबा मिळत आहे. तसेच शिवसेनाही राहूल गांधी आणि त्यांच्या पाठिशी असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.