![संग्रहित छायाचित्र](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F08%2Fparliament-6-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अखेर गुरुवारी सूप वाजले. दोन टप्प्यात हे अधिवेशन पार पडले. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. लोकसभेत एकूण २७ दिवसांत १७७ तास ५० मिनिटे इतका वेळ कामकाज चालल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत केंद्रीय अर्थसंकल्पावर १५ तास ३५ मिनिटे इतकी चर्चा झाली. ( Budget Session )
रेल्वेच्या पुरवणी मागण्यांवर १२ तास ५९ मिनिटे, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी संबंधित पुरवणी मागण्यांवर ११ तास २८ मिनिटे, हवाई वाहतूक मंत्रालयाशी संबंधित पुरवणी मागण्यांवर ७ तास ५३ मिनिटे तर व्यापार मंत्रालयाशी संबंधित पुरवणी मागण्यांवर ६ तास १० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती ओम बिर्ला यांनी दिली. संपूर्ण अधिवेशन काळात १३ विधेयके मंजूर झाली. याशिवाय १२ विधेयके नव्याने सादर करण्यात आली.
राज्यसभेच्या कामकाजाचे सूप वाजल्याची माहिती सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी दिली. गुरुवारी सदनाचे कामकाज चालू होताच शिवसेनेसहित इतर विरोधी सदस्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चर्चा घेण्याची मागणी करीत गदारोळ केला. विरोधकांनी वेलमध्ये उतरत प्रचंड गदारोळ केला. अखेर सभापती नायडू यांनी अधिवेशनाची सांगता होत असल्याचे जाहीर केले.
हेही वाचलं का?