पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लिव्ह इन रिलेशनशिप' भारतीय समाजातील नैतिक मुल्यांवर घाला घालत आहे. यामुळे समाजातील अनैतिक संबंधांना खतपाणी मिळतय. तसेच यामुळे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे, असे निरीक्षण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदवले.
'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणार्या महिलेवर वारंवार बलात्कार करणे, तिच्या सहमतीशिवाय गर्भपात केल्याप्रकरणी आरोपीला अटक झाली होती. त्याने अंतरिम जामीनासाठी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. ही याचिका फेटाळत न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांच्या खंडपीठाने 'लिव्ह इन रिलेशनशिप'वर कडक शब्दात ताशेरे ओढले.
यावेळी न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर म्हणाले की,"अलिकडे 'लिव्ह इन रिलेशनशिप' ही भारतीय समाजातील नैतिक मूल्यांवरच घाला घालत आहे. यामुळे समाजातील व्यभिचार वाढतोय तसेच लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे."
'लिव्ह इन रिलेशनशिप'मुळे सामाजिक विकृती आणि कायदेशीर वाद वाढत आहेत. ही व्यवस्था एक स्वतंत्र देते;पण या स्वातंत्र्याचे शोषण करणारेच ही व्यवस्था तत्काळ स्वीकारतात. मात्र त्यांना माहितीच नाही की, या व्यवस्थेची एक मर्यादा आहे. कारण ही व्यवस्था जोडीदाराला अनेक अधिकारांपासून वंचित ठेवते, असेही न्या. अभ्यंकर यांनी नमूद केले.
पीडित महिला संशयित आरोपीबरोबर अनेक वर्ष 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होती. त्याने तिला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले. याला कंटाळून पीडित महिला पुन्हा आपल्या घरी आली. तिचा एका तरुणाशी साखरपुडाही झाला. यानंतर तिचा 'लिव्ह इन रिलेशनशिप'मधील जोडीदाराने तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पीडितेच्या भावी पतीला व्हिडीओ पाठविण्याबरोबरच आत्महत्या करण्याची धमकी त्याने दिली. तसेच माझ्या आत्महत्येला पीडितेच्या कुटुंबासह तिच्या भावी पतीसह त्याच्या कुटुंबीयांनाही जबाबदार ठरवणार, अशीही धमकी ताे देत होता. या मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसात तक्रार दिली. यानंतर तरुणाला अटक करण्यात आली होती.
हेही वाचा :
पाहा व्हिडीओ :