पुढारी ऑनलाईन डेस्क: बिहारमध्ये सध्या प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपसोबत जाण्याची शक्यता असून, बिहारमधील सरकार लवकरच कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे 'राजद' अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगाआणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची खुर्ची धोक्यात आहे. तर दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव यांच्यासह लालूंच्या पत्नी राबरीदेवी यांना 'नाेकरीच्या बदल्यात जमीन' घोटाळा प्रकरणी 'ईडी'ने आज (दि.२७) समन्स बजावले आहे. (Land For Job Scam Updates)
नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी दिल्ली एव्हेन्यू कोर्टाने लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे. यानुसार, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबरीदेवी, सध्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मीसा भारती, हेमा यादव आणि इतर आरोपींना समन्स जारी केले. या सर्वांना शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी न्यायालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले व्यापारी अमित कात्याल यांच्यासाठीही न्यायालयाने प्रॉडक्शन वॉरंट जारी केले आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी आदेश देताना म्हटले की, दखल घेण्यास पुरेशी कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे. (Land For Job Scam Updates)
नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा हे २००४ ते २००९ या काळातील आहे. तत्कालिन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांना कथितपणे भेटवस्तू किंवा विकल्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये नोकरी दिल्या, असा आरोप आहे. या घोटाळ्याचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 'ईडी'ने मार्च महिन्यात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावरही छापे टाकले होते. ही कारवाई राजकीय आकसातून करण्यात आल्याचा आरोप आरजेडीच्या वतीने करण्यात आला होता. (Land For Job Scam Updates)