मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : आमदार निधीवर अवलंबून न राहता विविध योजनेच्या माध्यमातून येणारा विकास निधी गावात पाणी, शिक्षण व आरोग्य याकरिता वापरून गावचा सर्वांगीण विकास करा. जिल्ह्यातील सर्वच सरपंचांना योजनांची माहिती मिळावी यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. राधानगरीचा २०२४ चा आमदार राष्ट्रवादीचा असेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. वाघापूर (ता. भुदरगड) येथे राष्ट्रवादी पक्षाच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील होते.
यावेळी गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील म्हणाले, विद्यमान आमदार विकास निधीत पक्षपातीपणा करत आहेत. ५० खोक्यांचा कलंक पुसून टाकण्यासाठी ते एका कामाचे दोन वेळा उद्घाटन करत आहेत. गुवाहाटीहून आल्यानंतर विद्यमान आमदारांचा ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव म्हणजे त्यांना लागलेले ग्रहण आहे, अशी टीका पाटील यांनी आमदार आबिटकर यांच्यावर केली.
अध्यक्षीय भाषणात के. पी. पाटील म्हणाले की, ५० खोक्यांचे राजकारण करणाऱ्या गद्दारांना लोकांनी चांगलाच धडा शिकविला. त्यांची गद्दर पार्टी नसून गद्दार पार्टी आहे. गेल्यावेळी झालेली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक सदस्य राष्ट्रवादीचा निवडून आला होता. पण तो कुठे गेला कळलेच नाही. आगामी जि.प. व प.स. निवडणुकीत सर्व जागा राष्ट्रवादी जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मधुकर देसाई, पंडितराव केणे, अशोक कांबळे, सुनील कांबळे, धनाजी देसाई, संतोष मेंगाणे, संग्राम देसाई, बाळासाहेब शिंदे, श्रीपती दाभोळे, तानाजी कुरडे, धनाजी बरकाळे, सोन्या आरडे, विश्वनाथ कुंभार, बाळ देसाई, एन. डी. मगदूम, धैर्यशील पाटील कौलवकर, विकास पाटील, राजू भाटले, के. ना. पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी, स्वागत सरपंच बापूसाहेब आरडे, प्रास्ताविक पंडितराव केणे यांनी तर आभार सुनील कांबळे यांनी मानले.
हेही वाचा :