राहुरी : पुढारी वृत्तसेवा : आळंदी येथे प्रेमविवाह करुन आलेल्या नववधूचे 15 ते 20 अनोखळी नातेवाईकांनी अपहरण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे घडली. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अपहरणराचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरातील एका तरूणाचे व राहुरीच्या पुर्व भागातील तरूणीचे प्रेमसंबध होते. त्यांनी 27 नोव्हेंबर 2023 रोजी श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी पळून जाऊन कायदेशीर लग्न केलेे. त्यानतंर ते प्रेमीयुगल दि. 29 नोव्हेंबर रोजी राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर तरूण व तरूणीचे नातेवाईक राहुरी पोलिस ठाण्यात आले.
संबंधित बातम्या :
मात्र काहींनी मध्यस्ती करून त्यांच्यात समझोता घडवून आणला. त्यानंतर हे नवविवाहित जोडपे नवरदेवाच्या गावी टाकळीमिया येथे गेले. चहापाणी घेण्यासाठी आपल्या नातेवाईकाच्या घरी गेले. नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर तेथे 15 ते 20 अनोळखी इसम आले. त्यांनी 'आम्ही मुलीचे नातेवाईक असून आम्हाला तिच्याशी बोलायचे आहे', असे सांगितले. तेव्हा तीचा नवरा त्यांना म्हणाला, 'मी तिच्याशी कायदेशिर विवाह केला आहे. जे काय बोलायचे, माझ्या समोर बोला'. त्यावेळी त्या मुलीच्या अनोखळी नातेवाईकांनी 'तु जर मध्ये पडलास तर तुझ्याकडे पाहून घेऊ' अशी दमदाटी करून त्या नववधूला चारचाकी गाडीत बळजबरीने घालून तिला पळवून नेले. या तरुणाच्या तक्रारी नुसार अज्ञात 15 ते 20 जणांविरोधात अपहरणाचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या घटनेमुळे टाकळीमिया गावात खळबळ उडालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत.