पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी मोहन नायक याला कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. या प्रकरणातील हा पहिलाच जामीन आहे. गौरी लंकेश यांची हत्यात २०१७ला झाली होती. (Gauri Lankesh murder)
या प्रकरणातील सुनावणीत विलंब होत असल्याच्या कारणावरून हा जामीन देण्यात आला आहे. आरोपपत्रात ५२७ साक्षीदारांची नोंद आहे. यातील फक्त ९० साक्षीदारांची उलटतपासणी झालेली आहे. मोहन नायक यांच्यावर कर्नाटक कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज्ड क्राईम अॅक्टनुसार गुन्हे नोंद आहे. या कायद्यातील कलम १९ नुसार आरोपीचा जबाब पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर नोंदवली असेल तर ती न्यायालयात दाखल करण्यासाठी योग्य ठरते. पण नायक यांचा असा जबाब नोंदवला गेला नाही, ही बाब न्यायालयाने लक्षात आणून दिली. ही बातमी बार अँड बेंचने दिली आहे.
तसेच या कायद्यानुसार गुन्हा जरी सिद्ध झाला तर त्याला होणाऱ्या शिक्षा फक्त फाशी, जन्मठेप अशा स्वरूपाच्या नसून कमीतकमी शिक्षा ही पाच वर्षांचीही आहे. तर नायक गेली पाच वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात आहेत, आणि सुनावणीला होत असलेल्या विलंबाला नायक जबाबदार नाहीत, हे लक्षात घेत न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींनी घेतलेल्या बैठकांना नायक हजर होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. या बैठकांत लंकेश यांच्या खुनाचा कट रचण्यात आला. गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांना आश्रय देण्यासाठी नायक यांनी घर भाड्याने दिले होते, असा त्यांच्यावर आरोप आहे.
हेही वाचा