पुढारी ऑनलाईन डेस्क : गीतकार जावेद अख्तर यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करावे, अशी मागणी अभिनेत्री कंगना राणावतने शनिवारी (दि.५) मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयात केली. अंधेरी सत्र न्यायालयात कंगनाने अख्तर यांच्या विरुद्ध २०१६ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी मंगळवार, ८ ऑगस्ट राेजी होणार आहे.
या प्रकरणी न्यायालयाने जावेद अख्तर यांना १ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी सूट अर्ज सादर केला. कुटुंबातील सदस्याचे वैद्यकीय कारण देत हजर राहण्यापासून सूट मागितली होती. कौटुंबिक परिस्थितीमुळे अख्तर यांना मुंबईबाहेर जावे लागले, असे त्यांनी अर्जात म्हटले हाेते.
कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी अख्तर यांच्या या अर्जाला विरोध करत जामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली. जावेद अख्तर न्यायालयात जाणूनबुजून गैरहजर राहतात. त्यामुळे न्याय आणि समानतेच्या हितासाठी त्यांना पुढील तारखेला हजर राहण्यास जामीनपात्र वॉरंट जारी केले जावे, अशी विनंती सिद्दिकी यांनी केली. अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी मात्र सुनावणी दरम्यान परिस्थिती आणि युक्तिवाद भिन्न असल्याचा युक्तिवाद करत सिद्दीकी यांच्या मागणीला विरोध केला.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कंगनाच्या अर्जाला स्थगिती दिली. अख्तर यांना पुढील तारखेला जामीन प्रक्रियेचे पालन करण्याची संधी दिली आहे. दरम्यान, कंगनाने दाखल केलेल्या खटल्यात न्यायदंडाधिकार्यांनी बजावलेल्या समन्स प्रकरणावर ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
हेही वाचा :